दहावी-बारावीच्या परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र एकत्रित मिळणार
पुणे, ता. २ - दहावी-बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्रपणे मिळायचे. आता फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेच्या निकालापासूनच गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकत्रित मिळणार आहे. तशा सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी सर्व विभागीय मंडळांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.
राज्य मंडळाच्या कार्यकारी परिषदेची बैठक १२ फेब्रुवारीला झाली. या बैठकीत झालेल्या ठरावानुसार बारावी-दहावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेच्या निकालापासूनच विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकत्रित देण्यात येईल. या एकत्रित गुणपत्रकावर विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव या क्रमाने नामोल्लेख असेल.
विद्यार्थ्यांची गुणपत्रके अचूक असावीत व व्यवस्थित दिसावीत यासाठी प्रवेशपत्रांवर दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या प्रवेशपत्रांवरील छायाचित्र अस्पष्ट असल्यास त्यावर योग्य छायाचित्र चिकटवून मुख्याध्यापक, प्राचार्यांनी स्वाक्षरी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी मंडळाच्या संकेतस्थळावर 'फोटो करेक्शन' लिंक कार्यन्वित केली असून त्याद्वारे छायाचित्रात दुरुस्ती करता येणार आहे.
तसेच, विद्यार्थ्यांच्या नावाच्या बदललेल्या क्रमाबाबत सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना माहिती द्यावी, अशी सूचना विभागीय मंडळाना देण्यात आली आहे. कोणत्याही विद्यार्थ्याच्या नावात चूक असेल तर ती दुरुस्ती शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्यांनी विभागीय मंडळामार्फत तातडीने करुन घ्यायची आहे, याबाबतची सूचना शाळा-महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाला द्यावी व त्याचा अहवाल सादर करावा, असे डॉ. माळी यांनी परिपत्रकाद्वारे सर्व विभागीय मंडळांना सांगितले आहे.