‘टेक महाइम्पॅक्ट २०२६’परिषदेत ‘स्वस्थ महाराष्ट्र’घडविण्याचा निर्धार
पुणे, ता. २१ - शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या ‘टेक महाइम्पॅक्ट २०२६’ परिषदेचा समारोप ‘स्वस्थ महाराष्ट्र’ या विषयावरील परिसंवादाने झाला. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘स्वस्थ महाराष्ट्र’ घडविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आरोग्य, हवामान बदल, ग्रामीण विकास आणि नागरिक सहभागात एआय व डेटा-आधारित तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे मत मान्यवरांनी नोंदवले.
या परिसंवादात महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, प्रोजेक्ट मुंबईचे हेड ऑफ प्रोजेक्ट्स धर्मराज सोलंकी, इंडिया मिलेट्स को ॲण्ड एआय अॅमलीच्या संस्थापक डॉ. सोनम कापसे, आगा खान हॅबिटॅटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा लांगा, माहेर बहुउद्देशीय संस्थेच्या उपाध्यक्षा अल्पिनी देशमुख तसेच जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे हेल्थ अॅण्ड न्यूट्रिशन विभागप्रमुख डॉ. आशीष जैन यांनी सहभाग घेतला.
मिरा-भाईंदर आणि चंद्रपूरमध्ये जीआयएस मॅपिंग आणि हीट स्पॉट विश्लेषणाच्या साहाय्याने हवामान कृती आराखडे तयार करण्यात आल्याची माहिती प्रेरणा लांगा यांनी दिली. ‘सिटिझन सायन्स’ संकल्पनेद्वारे नागरिकांच्या सहभागातून डेटा संकलन, प्रदूषण मापन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी एआयचा उपयोग वाढत असल्याचे धर्मराज सोलंकी यांनी नमूद केले. ग्रामीण, आदिवासी आणि वंचित घटकांसाठी एआय आधारित शिक्षण, आरोग्य आणि पुनर्वसन उपक्रम राबविले जात असल्याची माहिती डॉ. सोनम कापसे यांनी दिली.
तंत्रज्ञान सर्वांसाठी परवडणारे, सुलभ आणि सहज उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे तसेच तंत्रज्ञानाचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी स्थानिक समुदायांचा सहभाग आणि सामूहिक जबाबदारी महत्त्वाची असल्याचे अल्पिनी देशमुख यांनी सांगितले.
डॉ. आशीष जैन यांनी शासन, स्वयंसेवी संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्या समन्वयातून आरोग्यविषयक योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एआय आणि डेटा-आधारित तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले.