राज्य सरकार प्रत्येक गावात बसवणार 'वेदर स्टेशन'
पुणे, ता. २३ - फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात 'वेदर स्टेशन' (स्वयंचलित हवामान केंद्र) बसवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी केंद्र शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या संदर्भातील बैठकीत नुकतेच सांगितले.
कृषिमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्ह्यातील हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील अनियमितता, शेतकऱ्यांना न मिळालेली नुकसानभरपाई आणि प्रलंबित तक्रारींबाबत मंत्रालय येथे विशेष बैठक पार पडली.
या बैठकीला आमदार मनीषा चौधरी, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक विनयकुमार आवटे, विमा कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.