बारावीची परीक्षा उद्यापासून सुरु, कॉपीमुक्त परीक्षांसाठी प्रशासनाची राहणार बारीक नजर
पिंपरी, ता. ९ - 'इयत्ता १२ वी'ची परीक्षा उद्या, मंगळवारपासून (ता. १०) सुरु होत आहे व दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण ४२ केंद्रावर बारावीची आणि ७३ केंद्रांवर दहावीची परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये 'कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची' काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्य व जिल्हा दक्षता समित्या आणि भरारी पथकांचीही परीक्षा केंद्रांवर बारकाईने नजर असेल तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांचाही परीक्षा केंद्रांवर बंदोबस्त असणार आहे.
बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ पर्यंत आणि दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ पर्यंत होणार आहे. परीक्षा केंद्रांच्या परिसरात १०० मीटरच्या आत मोबाईल, ब्लूटूथ उपकरणे, मोबाइल फोन, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, रेडिओ, कॅलक्युलेटर, लॅपटॉप अशी साधने जवळ बाळगण्यास किंवा वापरण्यास पूर्णपणे मनाई आहे. परीक्षा कालावधीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत कलम १६३ अन्वये आदेश लागू राहणार असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी व गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार व्हिडिओ चित्रीकरणही केले जाणार आहे.
परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्ती व वाहनांना प्रवेशबंदी आहे. संवेदनशील केंद्राबाहेर ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी मदत करणे, कॉपी पुरवणे किंवा परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करताना आढळल्यास संबंधितांवर Prevention of Malpractices Act 1982 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेवेळी सामूहिक कॉपी झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द करण्याची कारवाई होणार आहे, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
--------------------------------------------------------------------------------------------