महापालिकेने शहरातील साहित्य क्षेत्राला गती द्यावी, शहरातील साहित्यिकांची मागणी
पिंपरी, ता. २१ - पिंपरी-चिंचवड महापालिकेने मराठी भाषा संवर्धन समितीची नवीन समितीची स्थापना करुन शहरात मराठी साहित्य क्षेत्राला गती द्यावी या मुख्य मागणीसह इतर मागण्या शहरातील साहित्यिकांनी केल्या आहेत. याबाबत, लेखकांनी लोकप्रतिनिधींशी पत्रव्यवहारही केला आहे, अशी माहिती नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज आहेरराव यांनी दिली आहे.
शहरात मराठी भाषा संवर्धन समितीची नवीन समिती स्थापन करुन शहरातील साहित्यक् क्षेत्राला गती द्यावी, शहरातील साहित्यिकांच्या प्रकाशित साहित्याच्या प्रत्येकी १०० प्रति महापालिकेने खरेदी कराव्यात किंवा लेखक व कवीला १५ हजाराचे मानधन द्यावे, साहित्यिकांच्या विविध कार्यक्रमांसाठी सुसज्ज सभागृह देण्यात यावे, अमराठी भाषिकांना मराठीचे धडे द्यावेत, स्थानिक कलाकारांना घेऊन दरवर्षी एक साहित्य संमेलन घ्यावे... या शहरातील साहित्यिकांच्या मागण्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन समितीची २०१६ ला स्थापना करण्यात आली. गेल्या दहा वर्षात या समितीच्या केवळ चार ते पाच बैठका झाल्या. या बैठकांत साहित्यिकांनी अनेक ठराव मांडले होते. मात्र, या ठरावांबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही, असे अहेरराव यांनी सांगितले.
आहेरराव म्हणाले की ''गेली नऊ ते दहा वर्ष शहरातील नवोदित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल साहित्यिकांना काही आर्थिक मदत मिळावी, यासाठी मी महापालिकेसोबत पत्रव्यवहार करीत आलो आहे. मी मराठी भाषा संवर्धन समितीवर होतो, तेव्हाही याबाबत अनेक ठराव मांडले होते. मात्र, त्याविषयाची दखल घेण्यात आली नाही. आता पुन्हा एकदा महापालिकेवर नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे साहित्य क्षेत्रातून महत्त्वाच्या मागण्या पुढे येत आहेत. विद्यमान नगरसेवकांना मी पत्रव्यवहार केला आहे.''