महापालिका निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर भाजप कारवाई करणार, वरीष्ठांना अहवाल सादर
पिंपरी, ता. १७ - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला असला तरी 'अब की बार १०० पार'चा नारा पूर्ण होऊ न शकला नाही. याची कारणमीमांसा पक्षाकडून केली जाणार होती तसेच त्यासाठी पक्षाची चिंतन बैठकही झाली. त्यानुसार महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कृती करणाऱ्यांवर आता पक्षाकडून कारवाई केली जाणार आहे. याबाबतचा अहवाल पक्षाच्या कोअर कमिटीला सादर करण्यात आला आहे.
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहरातील नेत्यांना अपेक्षित यश न मिळाल्याची कारणांबाबत विचारणा केली. चिंतन बैठकीतही तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरातील नेत्यांना विचारणा केली. निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल हे पुन्हा एकदा स्पष्ट केले. त्यानुसार शहरातील नेत्यांनी पडताळणी करुन वरीष्ठांना अहवाल सादर केला आहे आणि त्यानुसार आता शहर भाजपमधील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे.