एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर आयुक्तांनी जप्तीची कारवाई करावी - राजू शेट्टी
पुणे, ता. १० - ''कायद्यानुसार ऊसतोडीनंतर १४ दिवसांच्या आत एफआरपी द्यायला हवी. दोन महिने उलटूनही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 'एफआरपी'ची रक्कम मिळालेली नाही. पाच हजार कोटींहून अधिक एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर आयुक्तांनी जप्तीची कारवाई करावी. अन्यथा आम्ही अवमान याचिका दाखल करु.'', असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.
कृषी आयुक्तालयात गुरुवारी (ता. ९) त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शेट्टी म्हणाले, '' उच्च न्यायालयाने सरकारला यापूर्वीच एक आदेश दिला होता.त्यानुसार, एफआरपीला विलंब केला किंवा तुकडे केले तरी १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना रक्कम द्यायची आहे. सर्वोच्च न्यायालयात नऊ सुनावण्या झाल्या. मात्र हिताचा आदेश अजूनही कायम आहे. मात्र, सरकारकडून आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. ''