तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त 'इंद्रायणी नदी'च्या पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी
पिंपरी, ता. २५ - यंदा ३ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत श्री क्षेत्र देहू येथे होणाऱ्या संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविकांचा भव्य मेळा जमणार आहे. त्यासाठी इंद्रायणी नदीच्या पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जारी केले आहेत.
जिल्हाधिकारी डुडी यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३३ (१)(ड) अन्वये प्राप्त अधिकारांनुसार हे आदेश लागू केले आहेत. देहू येथील इंद्रायणी नदीपात्रात कपडे धुणे किंवा पाणी दूषित होईल अशा कोणत्याही कृती करु नये. नदीच्या दोन्ही तीरांवरील पाणी पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी वापरण्यास सक्त मनाई राहील. नदीचे पाणी पिण्यास वापरू नये. भाविकांनी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या नळांचा वापर करावा. या आदेशाचे उल्लंघन कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट केले आहे.