आळंदी येथे राज्यभरातील किर्तनकारांची हितगुज, 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण' उपक्रमातील कार्यक्रम
पिंपरी, ता. २६ - महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण' या उपक्रमांतर्गत राज्यभरातील कीर्तनकारांची कार्यशाळा आळंदी येथे नुकतीच पार पडली. कार्यशाळेला अखिल वारकरी गुरुकुल संघ तसेच राज्यातील वारकरी शिक्षण संस्थांचे सर्व अध्यापक आणि कीर्तनकार उपस्थित होते.
कार्यशाळेत विविध वारकरी शिक्षण संस्थांच्या प्रमुखांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी 'राष्ट्रनिर्मितीची संस्कारमूल्ये' या अभ्यासक्रम पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तिकेचे प्रकाशन झाल्यानंतर त्याची प्रत सर्वांना देण्यात आली. किर्तनकारांनी शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश, अध्यापनातील पद्धतशीरता, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जडणघडण, चारित्र्यनिर्मिती या मूल्यांचे महत्त्व आपल्या भाषणात मांडले. वारकऱ्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण उपक्रमाला पुढे नेण्यासाठी आम्ही जबाबदारी घेत आहोत, असे सांगितले.
वारकरी संप्रदाय युवा मंचचे अध्यक्ष अक्षय भोसले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन उमेश बागडे यांनी केले. किशोर धुमाळ यांनी आभार मानले.