नसरापूर बालिकेवर अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला जन्मठेप की फाशी.....२९ जूनला होणार निर्णय
नसरापूर बालिकेवर अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला जन्मठेप की फाशी.....२९ जूनला होणार निर्णय
विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला ठरवले दोषी, दोन महिन्यात खटल्याचा निकाल
पुणे, ता. २५ - संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नसरापूर येथील बालिकेवरील अत्याचार व खूनाच्या खटल्याचा निकाल आज, गुरुवारी (ता. २५) लागला. साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला विशेष न्यायालयाने दोषी ठरविले. सरकार पक्षाने हा गुन्हा 'दुर्मिळातील दुर्मिळ' स्वरुपाचा असल्याचे नमूद करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून निकाल राखून ठेवला असून २९ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. आरोपी कांबळे याला मृत्युदंड की जन्मठेप भोगावी लागणार, हे २९ जूनला स्पष्ट होईल.
राज्यातील न्यायालयीन इतिहासात जलदगतीने सुनावणी झालेला नसरापूर अत्याचार प्रकरण हा पहिला खटला ठरणार आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी या प्रकरणाचा निकाल देत आरोपीला दोषी ठरवण्यात आले आहे.
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी शिक्षेबाबत युक्तिवाद करताना सर्वोच्च न्यायालयाच्या १२ महत्त्वपूर्ण निर्णयांचा दाखला दिला. आरोपीने केलेले कृत्य अत्यंत घृणास्पद, क्रूर आणि समाजमन हादरविणारे असल्याचे नमूद करत त्याला सर्वोच्च शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. सरकार पक्षाने सादर केलेले डीएनए अहवाल, न्यायवैद्यकीय पुरावे, सीसीटीव्ही चित्रीकरण, परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपीचा गुन्हा निर्विवादपणे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने मान्य केले.
ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले. त्यापैकी दोन गुन्ह्यांमधे फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात १४ वर्षा़च्या कारावासाची शिक्षेची तरतूद असल्याची कोर्टाची माहिती आहे. तर यावेळी न्यायाधीशांनी आरोपी भिमराव कांबळेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करुन विचारले की, तू तो प्रसंग आठव आणि तुच सांग की तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे. त्यावर आरोपी भिमराव कांबळेने पुन्हा बनाव रचला आणि न्यायालयाला सांगितले की, " मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याचवेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. मी तुला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती, असंही आरोपीने म्हटलं आहे. त्यानंतर न्यायाधीशांनी गुन्हेगार ठरलेल्या भीमराव कांबळेला म्हटले की "आता तू जे सांगतो आहेस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय. तुला कोणती शिक्षा द्यायला हवी", न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भिमराव कांबळेने कोणतेच उत्तर दिले नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसायला सांगितले.
गुन्हेगार ठरलेल्या भिमराव कांबळेला कोणती शिक्षा देण्यात यावी यासाठी दोन्ही पक्षांकडून न्यायाधीशांसमोर युक्तीवाद सुरु आहे. सरकारी वकिल युक्तीवाद करत आहेत आणि त्यांच्याकडून भिमराव कांबळेला मृत्युदंड देण्याची न्यायाधीशांकडे मागणी करण्यात आली आहे. आरोपी दोषी ठरल्यानंतर आता त्याला जन्मठेप की फाशी हा निर्णय २९ जूनला होणार आहे.