शिष्यवृत्ती परीक्षेसाठी भरारी पथके नेमण्याची मागणी
पिंपरी, ता. १८ - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राज्यात रविवारी (ता. २२) इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथके पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नेमावीत, अशी मागणी राज्य परीक्षा परिषदेचे मूल्यांकन समितीचे माजी सदस्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ सातपुते यांनी केली आहे.
याबाबत सातपुते यांनी, पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाला निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यात राजगड, भोर, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यात अतिदुर्गम भाग आहे. हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होवू नाही, यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथके पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नेमावीत. भरारी पथकांनी नुसत्या हमरस्त्यावरील परीक्षा केंद्रांना भेटी देऊन चालणार नाही. तर अतिदुर्गम भागातील परीक्षा केंद्रांना भेटी देणे गरजेचे आहे.