यमुनानगर-निगडीमध्ये रस्त्याच्या कामात जलवाहिनी फुटून पाणीगळती
पिंपरी, ता. ३ - यमुनानगर-निगडी परिसरात पाणीपुरवठा व विद्युत वितरण विभागाच्या निष्काळजीपणामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे आणि दुसरीकडे मागील तीन दिवसांपासून परिसरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. याचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाबा परब, मनोज लांडगे यांनी पाण्यात बसून आंदोलन केले.
स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रारी करुनही संबंधित विभागांकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला जात आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांना पिण्याचे व दैनंदिन वापराचे पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाविरोधात संतापाची भावना निर्माण झाली आहे.
याबाबत बोलताना परब म्हणाले, “नागरिकांना पाणी मिळत नाही आणि दुसरीकडे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पाणी वाया जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घेऊन समस्या सोडवावी, अन्यथा तीव्र आंदोलन पुकारले जाईल.”