माथाडी कामगारांची नवी भरती प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी चिंचवडमध्ये आंदोलन

भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप, अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

पिंपरी, ता. २६ -  माथाडी कामगारांच्या नव्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे. संबंधित मुकादमाने स्वतःच्या फायद्यासाठी भरती करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे ही  कायदेशीर भरती प्रक्रिया तातडीने रद्द करावी या मागणीसाठी निघोजे येथील महिंद्रा कंपनीतील माथाडी (गट क्रमांक ६७७)  कामगारांनी माथाडी मंडळाच्या  चिंचवड येथील कार्यालयात आंदोलन केले. लेखी आश्वासन मिळेपर्यंत कार्यालयातून बाहेर पडणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. मंडळाचे सचिव सुनील आव्हाड यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी आंदोलक माथाडी कामगार सचिन चौधरी यांनी  सांगितले की, ''नियमानुसार भरती करताना माथाडी टोळीतील ७५ टक्के कामगारांच्या सह्या आवश्यक असतात. टोळी क्रमांक ६७७ मध्ये एकूण ८७ कामगार असून त्यातील ४१ कामगारांनी लेखी विरोध नोंदविला. किमान ६६ सह्या आवश्यक होत्या. ''

माहिती अधिकार कायद्यानुसार २८ नोव्हेंबर २०२५ रोजी अर्ज करुनही अद्याप माहिती दिली नाही. याबाबत ५ जानेवारी २०२६ ला पहिल्या अपीलानंतरही सुनावणी घेतली नाही. त्यामुळे मंडळाचा कारभार संशयास्पद आहे. माथाडी मंडळाकडे नोंदणीकृत बेरोजगार कामगारांना प्राधान्य देऊनच भरती करावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. 

आंदोलनात सचिन चौधरी, नामदेव कंद, कैलास दौंडकर, अरविंद गायकवाड, विनोद दौंडकर, नवनाथ थिटे, ऋषिकेश थोपटे, विनायक कंद, वैभव कंद, अतुल गारगोटे, राहुल आंद्रे, सोमनाथ दौंडकर, मयूर टिंगरे व कामगारांनी आंदोलनात सहभाग घेतला. 

- ५ मार्चला बैठक 

'' ५ मार्चला आंदोलक माथाडी कामगारांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी  चिंचवड येथील माथाडी मंडळाच्या कार्यालयात बैठक घेतली जाईल. कामगारांनी मागविलेली माहिती त्यांना दिली जाईल.''

- सुनील आव्हाड, सचिव, पिंपरी चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance