लेह-लडाखच्या सहलीवरुन परत येताना थेरगावमधील तरुणांचा राजस्थामध्ये अपघात, तिघांचा मृत्यू
पिंपरी, ता. १८ - लेह-लडाख येथे सहलीवरुन परतत असताना पिंपरी-चिंचवडमधील तरुणांच्या फॉर्च्युनर गाडीला राजस्थानमध्ये बुधवारी (ता. १८) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात तिन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. कुणाल चोरडिया, सिद्धांत आल्हाट व मयूरेश पडाळे हे तीन मित्रांनी या अपघातात जीव गमावला आहे. अपघाताची बातमी समजताच थेरगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.
पिंपरी-चिंचवडमधून एकूण १६ मित्रांचा ग्रुप २७ फेब्रुवारीला तीन गाड्यांमधून लेह-लडाख येथे सहलीसाठी गेले होते. सहलीचा आनंद व आठवणी सोबत घेऊन ते पुण्याला परत येत होते. बुधवारी (ता. १८) सकाळी ते राजस्थानमध्ये पोचले. तेथे दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वे जवळ उड्डाणपुलाचे काम सुरु होते. फॉर्च्युनर गाडीतील मित्र या पुलावरुन गाडी नेत असताना त्यांना पुलाचा नेमका अंदाज न आल्याने त्यांची गाडी थेट पुलावरुन खाली रस्त्यावर कोसळली आणि गाडीतील तिघे मित्र जागीच मरण पावले.
या अपघातात गाडीच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. त्यामुळे मृतांना बाहेर काढणे देखील अवघड झाले होते. अपघातानंतर स्थानिक नागरीकांनी तत्काळ मदतकार्य सुरु केले. मृत तरुण हे थेरगाव-चिंचवड येथील रहिवासी होते.