राज्यभरात उन्हाचा पारा वाढला, अकोल्यात ४०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
नागरीकांना काळजी घेण्याचे हवामान विभागाकडून आवाहन
पुणे, ता. १० - राज्यभरात उन्हाचा पारा वाढला आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यात ४०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, हे देशातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. सोलापूर येथे पारा ४० अंश सेल्सिअसवर पोहोचला असून, वाशीम, वर्धा, अमरावती आणि ब्रह्मपुरी येथे जवळपास ३९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील सर्वांत कमी ११.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मध्य प्रदेशातील रायगड येथे सपाट भूभागावर नीचांकी १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.
हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, कमाल तापमान ४० अंशांपार गेल्यास आणि सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्णतेची लाट घोषित केली जाते. सोमवारी (ता. ९) अकोल्यात उष्णतेची लाट नोंदवली गेली. १० मार्च रोजीही कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी उष्ण लाटेचा आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणातील काही भागांसाठी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे आहे व येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. बिहारपासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने हे तापमान वाढीचे कारण आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोला, अमरावती, वर्धा येथे उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
पुढील काही दिवसांतही अशाच प्रकारचे उष्ण वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. वाढते ऊन लक्षात घेऊन नागरीकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे, हलके कपडे घालावेत आणि उष्माघातापासून (Heatstroke) सावध राहावे, असे आवाहनही हवामान विभागाने केले आहे.